Scoregraph Media

सेंद्रीय शेतीला भविष्यात चांगले दिवस, बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – शरद पवार

स्कोअरग्राफ मिडीया

सेंद्रिय व विषमुक्त शेती ही काळाची गरज असून सेंद्रीय शेतीला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. लोकांना विषमुक्त अन्न पुरवणे हे मानवतेचे काम आहे या शब्दात महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन –  मोर्फाच्या कामाचे कौतुक करत मोर्फाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीतील प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न राज्य व केंद्र सरकार पुढे मांडू आणि त्याची सोडवणूक होईपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा करू असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी व्यक्त केले.

 

काल दि २२ जून रोजी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय येथे डॉ शिरनामे सभागृहात महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अर्थात मोर्फा यांच्या वतीने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती व शेतकरी संवाद मेळाव्यात खासदार पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मोर्फाचे व्यवस्थापकीय संचालक युगेंद्र पवार, कृषी सहसंचालक श्री सुनील बोरकर, मोर्फाचे अध्यक्ष  अंकुश पडवळे, उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे, मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे , अर्जुनराजे पाटणकर, सुदामराव इंगळे,  माणिकराव झेंडे, डॉ राजेश कोकरे, मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव आधी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेती क्षेत्रात बदल होत आहेत. त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजे. मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त व सेंद्रिय शेतीतील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणत आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर लवकरच बैठका घेऊन सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवणे व मार्केटिंग साठी जागा उपलब्ध करण्यासाठी बैठका घेऊ असे आश्वासन खा. पवार यांनी बोलताना दिले.

यावेळी बोलताना  युगेंद्र पवार म्हणाले की, सेंद्रिय शेतीला बळकटी आणण्यासाठी मार्केटची लिंक उभा करून उत्पादनांना शाश्वत मार्केट उभा करण्यासाठी मोर्फा संघटनेच्या माध्यमातून लवकरच प्रयत्न केले जातील. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत असून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करून चांगले गुणवत्ता पूर्ण सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काळात तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल.
मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळे म्हणाले, सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत, पण मार्केटिंग मध्ये शासनाच्या मदतीची अत्यंत गरज आहे. खा. शरद पवार यांनी राज्य व केंद्र सरकार बरोबर सेंद्रिय शेतीच्या प्रश्नाबाबत अनेक बैठका घेऊन राज्याचे सेंद्रिय शेतीचे धोरण बनवण्यामध्ये पवार साहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे. यापुढे आपणाला नैसर्गिक शेतीपेक्षा शाश्वत सेंद्रिय शेतीची गरज असून त्या दृष्टीने मोर्फा संघटना राज्यामध्ये पावले टाकत असल्याचेही पडवळे यांनी बोलताना सांगितले. यावेळी उपस्थित पुणे, मावळ, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर (अ नगर), नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद), बीड, उस्मानाबाद, लातुर, परभणी, नांदेड, पालघर, येथून आलेल्या सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी शरद पवार यांनी थेट संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मोर्फाच्या उपाध्यक्षा स्वाती शिंगाडे यांनी केले. सदर सेंद्रिय शेती शेतकरी परिसंवाद बैठकीस राज्यभरातून सेंद्रिय व विषमुक्त शेती करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.कल्याण काटे, नितीन तावरे, सर्जेराव जेधे, मदन वाबळे, हृषिकेश गायकवाड, वैभव वाघमोडे, विनय वर्पे
यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हरिभाऊ यादव यांनी केले.

Spread the love

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज

[democracy id="1"]